मुंबई : ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एलआयसी ऑफ इंडिया) या भारतातील सर्वात मोठ्या आयुर्विमा कंपनीने सप्टेंबर २०१७ अखेरीपर्यंतच्या सहा महिन्यांतील ऑडिटेड आकडेवारी जाहीर केली आहे.
कॉर्पोरेशनने सप्टेंबर २०१७च्या अखेरीपर्यंत १,४८,०३७ कोटी रुपयांचा एकूण प्रीमिअम मिळवला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १,३२,२५७ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ११.९५ टक्के वाढ झाली आहे. कॉर्पोरेशनचे ढोबळ एकूण उत्पन्न गेल्या वर्षी याच कालावधीतील २,२२,३५० कोटी रुपयांवरून २,५०,२६७ कोटी रुपयांपर्यंत म्हणजे अंदाजे १२.५६ टक्के वाढले, तर कॉर्पोरेशनच्या एकूण मालमत्तेत १४.०४ टक्के वाढ झाली.
एकूण पॉलिसी पेआउटच्या प्रमाणात ३.५१ टक्के, कॉर्पोरेशनच्या नव्या व्यवसायात २३.६८ टक्के आणि पेन्शन व ग्रुप सुपरअन्युएशन बिझनेसला नव्या व्यवसायाच्या प्रीमिअममधून मिळालेल्या उत्पन्नात २७ टक्के वाढ झाली. या विभागाने सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत ५.८१ कोटी जणांना संरक्षण दिले आहे.
निकालांविषयी बोलताना एलआयसी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही. के. शर्मा म्हणाले, ‘आमची कामगिरी आमच्या अपेक्षेप्रमाणे झाली आहे. कॉर्पोरेशनने सक्षम पाया व मूलभूत मूल्ये यांच्या मदतीने उत्तम निकाल नोंदवले आहेत. आमच्यावर विश्वास असलेल्या देशभरातील आमच्या ग्राहकांनी आम्हाला पाठिंबा दिला व उत्तम आर्थिक कामगिरी करण्याची क्षमता दिली.
ग्राहकांचे समाधान व नफा हे दोन्ही साध्य करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि ग्राहकांना मिळणारा अनुभव व कंपनीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आम्ही सातत्याने तंत्रज्ञानावर भर देतो.’
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाविषयी:
मुंबई येथे मुख्यालय असलेल्या एलआयसीची आठ क्षेत्रीय कार्यालये, एकशे १३ विभागीय कार्यालये, दोन हजार ४८ शाखा, एक हजार चारशे आठ सॅटेलाइट कार्यालये व एक हजार दोनशे ३८ मिनी कार्यालये आहेत. एलआयसीने सक्षम वित्तीय संस्था म्हणून नाव कमावले असून उत्तम प्रशासन व पारदर्शकता ही ठळक वैशिष्ट्ये आहेत.
सुरुवातीला पाच कोटी रुपयांच्या भांडवलाने सुरू झालेल्या कॉर्पोरेशनने हळूहळू शंभर कोटी रुपयांपर्यंत वाढ केली. आज एलआयसी अंदाजे २९ कोटी योजनांची सेवा देत आहे. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून विविध सुविधांच्या माध्यमातून व दावे वेगाने पूर्ण करण्याच्या माध्यमातून आपल्या योजनाधारकांना उत्तम अनुभव देण्यासाठी एलआयसी सातत्याने प्रयत्न करत आहे.
अप्रतिम कामगिरी व योजनाधारकांच्या अपेक्षेनुसार सेवा देण्याची क्षमता यामुळे ‘एलआयसी’ या क्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड आहे. गेली ६१ वर्षे एलआयसी पाय रोवून उभी आहे आणि आज ती विश्वास, आत्मविश्वास व विश्वासार्हता यासाठीचा ‘आयकॉन’ ठरली आहे. एलआयसी विविध योजनांमार्फत लाखो जणांना जीवनकवच देत आहेच; शिवाय पायाभूत सुविधा व सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक करून, राष्ट्रनिर्मितीसाठी विविध प्रकल्प राबवत जीवनकवचाच्या पलीकडे जाऊन मोठी भूमिका निभावत आहे. या प्रकल्पांमध्ये वीजनिर्मिती व ट्रान्समिशनचे प्रकल्प/योजना, गृह क्षेत्र, पाणीपुरवठा व सांडपाणी प्रकल्प, रस्ते, पूल व रस्ते वाहतूक विकास यांचा समावेश आहे.